"उद्धव ठाकरेंनी फक्त एक पाऊल टाका, राज ठाकरे शंभर पावलं चालत येतील!" — मनसेची स्पष्ट भूमिका

महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि६ जून :- राजकीय प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागलेली असताना, मनसेने शिवसेना (ठाकरे गट) सोबत युतीबाबत आपली स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. 'दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं' अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये बळावत असली तरी, याबाबत कोणताही ठोस प्रस्ताव अद्याप मनसेकडे आलेला नसल्याचं स्पष्टीकरण मनसे नेत्यांनी दिलं आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली.
"तोंड पोळल्यामुळे आता ताक फुंकून पितोय"
राज ठाकरे हेच पक्षाचे अंतिम निर्णय घेणारे आहेत. २०१४ आणि २०१७ च्या घटनांचा उल्लेख करत संदीप देशपांडे म्हणाले, “त्यावेळी बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले होते, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट नाकारली होती. सुभाष देसाईंना मात्र त्यांनी भेटून संवाद साधला. तेव्हा तरी आमच्याकडून प्रस्ताव गेला होता. पण आता तर कुठलाही ठोस प्रस्तावच आमच्याकडे आलेला नाही. अशा परिस्थितीत निर्णय कसा घ्यायचा?”
"फोन करा, चर्चा करा – प्रस्ताव ऐकायला आम्ही तयार!"
अविनाश जाधव यांनीही यावर भाष्य करत म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत. जर संपूर्ण शिवसेना असं म्हणत असेल की, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंबरोबर यायला हवं, तर त्यांनी कमीत कमी एक कॉल तरी करावा. कॅमेऱ्यासमोर बोलून काही उपयोग नाही. एक पाऊल पुढे या, राज ठाकरे शंभर पावलं पुढे येतील.”
तसेच, "जोपर्यंत ठोस प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत आमच्याकडून कोणतीही हालचाल होणार नाही," असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं
निष्कर्ष: ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत चर्चा रंगत असली, तरी मनसेकडून स्पष्ट सिग्नल मिळालाय — संवाद हवा, पण तो थेट आणि ठोस.