अतिक्रमण हटवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा – आयुक्त जी. श्रीकांत यांचा इशारा
बीड बायपास, पैठण रोड, जालना रोडवरील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश; नागरिकांना स्वयंहून अतिक्रमण हटवण्याचे आवाहन

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २६ जून :- शहरातील वाहतूक व्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निर्णायक पावले उचलत आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी बीड बायपास, पैठण रोड आणि जालना रोड या प्रमुख मार्गांवरील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण त्वरित हटवण्याचे आदेश दिले असून, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ही अतिक्रमणे काढून टाकावीत, अन्यथा कठोर कारवाईला तयार राहावे, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
या संदर्भात २४ जून २०२५ रोजी मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाने अतिक्रमणबाबत स्पष्ट आदेश दिले असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मनपाने नियोजनबद्ध मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेतली जात असून, सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमण केवळ कायद्याचे उल्लंघन नाही, तर अपघातांचे प्रमाणही वाढवते, याची जाणीव मनपा प्रशासनाने नागरिकांना करून दिली आहे.
आयुक्त जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले की, "वरील तीन रस्त्यांवरील सर्व्हिस रोडवर अतिक्रमण करणाऱ्यांनी तात्काळ अतिक्रमण स्वतःहून हटवावे. अन्यथा महापालिकेच्यावतीने थेट पाडकाम करण्यात येईल आणि त्याचा संपूर्ण खर्च संबंधितावरच वसूल केला जाईल."
मनपाकडून लवकरच सर्व्हेक्षण मोहीम हाती घेण्यात येणार असून, संबंधित क्षेत्रातील सर्व मिळकतींचे परीक्षण केले जाणार आहे. परवानाधारक बांधकाम असल्यास त्याचे कागदपत्र सादर करावेत, अन्यथा नियमानुसार प्रक्रिया करून मिळकती नियमित करण्याचा पर्याय खुला आहे. कागदपत्रे नसलेल्या मिळकतींना थेट अनधिकृत घोषित करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही प्रशासकांनी दिला आहे.
या मोहिमेमुळे रस्ते मोकळे, स्वच्छ व वाहतुकीसाठी उपयुक्त होतील. नागरिकांच्या हितासाठी ही कारवाई राबवली जात असून, "सर्वांनी महापालिकेस सहकार्य करून कायदेशीर व सुसंस्कृत नागरी जीवनासाठी योगदान द्यावे," असे आवाहनही प्रशासक श्रीकांत यांनी केले.
जनहितासाठी, अतिक्रमणमुक्त शहरासाठी!