"प्रभाग रचना वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आदेश"

"प्रभाग रचना वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आदेश"

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.१७ :- नगरपालिका, नगरपंचायत यांचा प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम प्राप्त झाला असून त्यानुसार विहित कालमर्यादेत प्रभाग रचना पूर्ण करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस नगरपालिका प्रशासन विभागाचे ऋषिकेश भालेराव, कन्नड नगरपालिका प्रशासक संतोष गोरड, वैजापुर नगरपालिका मुख्याधिकारी डॉ.संगिता नांदुरकर, गंगापूर नगरपालिका मुख्याधिकारी संतोष आगळे, खुलताबाद नगरपालिका मुख्याधिकारी समीर शेख आदी उपस्थित होते.

 जिल्ह्यात वैजापूर, सिल्लोड, कन्नड, पैठण या ब वर्ग नगरपालिका तर गंगापुर, खुलताबाद या क वर्ग नगरपालिका तसेच फुलंब्री व सोयगाव या नगरपंचायत आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार या सर्व नगरपालिका क्षेत्रात निर्वाचित सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार वैजापूर-२५, सिल्लोड-२८, कन्नड-२५, पैठण-२५, गंगापूर-२०, खुलताबाद-२०, फुलंब्री-१७ सदस्य आहेत. त्यानुसार वैजापूर-१२, सिल्लोड-१४, कन्नड-१२, पैठण -१२, गंगापुर-१०, खुलताबाद-१० तर फुलंब्री-८ असे प्रभाग असतील.

प्रभाग रचनेचा कार्यक्रम दि.१७ पासून सुरु झाला असून १७ जून ते ३ जुलै या दरम्यान प्रारुप प्रभाग रचना तयार करणे, दि.४ जुलै रोजी प्रारुप प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवून त्यास मान्यता घेणे, दि.१५ ते २१ जुलै दरम्यान प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करुन त्यावर हरकती व सुचना मागविणे, दि.२२ ते ३१ जुलै प्राप्त हरकतींवर जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सुनावणी घेणे, दि.१ ते ७ ऑगस्ट दरम्यान सुनावणीनंतर प्राप्त सुचना शिफारशी विचारात घेऊन केलेली अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगास मान्यतेसाठी पाठवणे, दि.२२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसुचनेद्वारे प्रसिद्ध करणे, असा कार्यक्रम देण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमाचे तंतोतंत पालन करुन आपल्या नगरपालिकेची प्रभाग रचना तयार करावी. त्यासाठी दिलेल्या कालमर्यादेचे पालन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिले. यावेळी नगरपालिकांनी करावयाच्या १५० दिवसांच्या सेवा सुधारणा कार्यक्रमांचे सादरीकरणही करण्यात आले

.