पेट्रोलपंप चालक आणि वितरक कंपन्यांची संयुक्त बैठक तात्काळ वितरण सुरळीत करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पेट्रोलपंप चालक आणि वितरक कंपन्यांची संयुक्त बैठक तात्काळ वितरण सुरळीत करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
पेट्रोलपंप चालक आणि वितरक कंपन्यांची संयुक्त बैठक तात्काळ वितरण सुरळीत करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद), दि.२७ :- जिल्ह्यात येणारा पेट्रोल डिजेलचा साठा हा पूर्वी इतकाच किंबहुना थोडा जास्तच आहे. असे असतांना पेट्रोल पंपावर रांगा दिसत आहेत. मागणी व पुरवठा यात वितरक कंपन्या आणि पेट्रोलपंप चालक यांच्या दरम्यान असलेल्या तक्रारींवर तातडीने तोडगा काढून वितरण सुरळीत करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पेट्रोलियम वितरण कंपन्या व पेट्रोलपंप चालक यांना दिले.

 जिल्ह्यातील पेट्रोलपंपांवर वाहनधारकांच्या गेल्या दोन दिवसांपासून रांगा लागलेल्या दिसत आहेत. ही परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत घटकांबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पेट्रोलपंप चालक आणि वितरक कंपन्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलावली होती. 

 बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, लेखाधिकारी पी.पी. होळकर, सहा. पुरवठा अधिकारी संदीप शिंदे,भारत पेट्रोलियमचे शशांक तिवारी, हिंदुस्थान पेट्रोलियमचे अजयकुमार सिन्हा, इंडियन ऑईलचे गणेश खेत्री तसेच पेट्रोलपंप चालक संघटनेचे अकील अब्बास, जिशान देशमुख, गणेश दरख, राजेंद्र सलुजा, नवजिंदरसिंग आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, अफवा पसरवणाऱ्यांवर पोलीस विभागामार्फत तपास करुन कारवाई होईलच. मात्र पुरेसा इंधन साठा असतांना पेट्रोलपंपावर रांगा का लागत आहेत? याबाबत वितरक कंपन्या आणि पेट्रोलपंप चालक यांनी आपापसात समन्वय साधून परिस्थिती हाताळावी व वितरण सुरळीत करावे. 

 जिल्हाधिकारी म्हणाले की, लोकांना आपल्याकडील साठ्याची माहिती द्या. लोकांना इंधन उपलब्ध करुन द्या. आजच जिल्हा प्रशासनाने दुचाकी वाहनांना २०० रुपयांचे पेट्रोल व चारचाकी वाहनांना २००० रुपयांचे इंधन असे जे बंधन घातले होते ते ही हटवले आहे. त्यामुळे वितरणाचा कोणताही अडथळा वा निर्बंध नाही. इंधन वितरण डेपो ते पंप या दरम्यान होणाऱ्या वाहतुकीचा कालावधी कमीत कमी करुन इंधन उपलब्ध करा. पेट्रोलपंपांवर कायदा सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात पोलिसांना सुचना देण्यात आली आहे. मात्र नागरिकांनी संयम ठेवावा. अफवांवर विश्वास ठेवू नये. नेहमीप्रमाणे पेट्रोल डिजेल आपल्या वाहनात भरा. उगाचच जादा साठा करु नका, असे आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.

 ग्रामिण भागात विशेषतः शेतीच्या कामांना लागणाऱ्या डिजेलचीही उपलब्धता करुन देण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी स्पष्ट केले.

*इंधन पुरवठा मर्यादीत करण्याचे आदेश रद्द*

पेट्रोलपंपांवरील वाहनधारकांची अचानक गर्दी वाढल्याने जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करुन पेट्रोल डिजेल मर्यादीत करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. तथापि, डिजेल व पेट्रोलचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर इंधन निर्बंधाच्या आदेशाची आवश्यकता नसल्याने आधीचे आदेश रद्द करण्यात येत असल्याचे आदेश आज पुरवठा विभागाने जारी केले.