"लाडकी बहीण योजनेतील गोंधळावरून अजित पवारांनी राजीनामा द्यावा" – संजय राऊत यांची मागणी

महाराष्ट्र वाणी.com
मुंबई दि २ जुन :- लाडकी बहीण योजनेत झालेल्या अनियमितता आणि अपात्र लाभार्थ्यांना दिलेल्या मदतीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेत काही त्रुटी झाल्याची कबुली दिल्यानंतर, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट त्यांचा राजीनामा मागितला आहे.
अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना, "योजनेच्या पडताळणीचं काम सुरू आहे. यापुढे फक्त पात्र आणि गरजू महिलांनाच लाभ दिला जाईल," असे स्पष्ट केलं. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी तीव्र टीका करत, "जर अपात्र महिलांना लाभ दिला गेला, हे तुम्ही कबूल करत असाल, तर त्याची जबाबदारी स्वीकारा आणि राजीनामा द्या," अशी मागणी केली आहे.
"अर्थ खात्याच्या माध्यमातून झालेली लूट"
राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटलं, "लाडकी बहीण नव्हे, तर लाडक्या भावांनी नावं बदलून योजना लुटली. सरकारी कर्मचाऱ्यांनी शेकडो कोटींचा फायदा घेतला. अजित पवार यांना तेव्हा मतं हवी होती म्हणून पडताळणी केली गेली नाही. ही लूट अर्थ खात्याच्या माध्यमातून झाली आहे," असा आरोप त्यांनी केला.
"निवडणुकीपुरती योजना?"
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना आणण्यात आली. विरोधकांनी आधीपासूनच ही योजना निवडणूकपूर्व स्टंट असल्याचा आरोप केला होता. आता खुद्द उपमुख्यमंत्र्यांनीच त्रुटी मान्य केल्याने, सरकारची अडचण वाढली आहे.
सरकारवर एकाच वेळी फटकारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तिघांनाही लक्ष्य करत राऊत म्हणाले, "या तिघांना राज्याच्या समस्यांबाबत काहीही गांभीर्य नाही. टेंडर, कमिशन, पक्षफोड हेच चाललं आहे. मुख्यमंत्री लग्नसमारंभात, उपमुख्यमंत्री जनतेपासून दूर... राज्याची प्रतिष्ठा कुठे आणि कोणाच्या हाती आहे?" असा सवाल त्यांनी केला.