रुग्णसेवेत शासनासोबत खाजगी संस्थांचाही सहभाग- उपमुख्यमंत्री अजित पवार
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.१४ :- रुग्णांना उपचार सुविधा देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे शासनाचे धोरण आहे. रुग्णांना उपचार सुविधा देण्यात शासनासोबतच खाजगी संस्थांचाही सहभाग आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.
येथील कर्नावट कर्करोग रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. आ. सतिष चव्हाण, आ. विक्रम काळे,आ. अब्दुल सत्तार, डॉ. विनय कर्नावट, डॉ. मधुबाला कर्नावट, डॉ.आनंद, डॉ. सोहम आणि डॉ. खुशबु कर्नावट यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, कर्करोग या आजाराचे वेळीच निदान आणि लगेच उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा कर्करोग रुग्णालयांचा मुंबई पुणे सोडून अन्य शहरात उपयोग होतो. चांगले दर्जेदार उपचार दिले जातात. युवकांनी व्यसनांपासून दुर रहावे. म्हणजे कॅन्सर सारखा आजारही आपल्यापासून दुर राहतो. कॅन्सरवरील उपचारांबाबत संशोधन होत असतांना कॅन्सर होऊ नये यासाठी आपण सगळ्यांची काळजी घेणे आपल्या दैनंदिन जीवनमानात, आहारात बदल करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.