धोकादायक इमारतीवर मनपाची कारवाई! मोतिकारंजा अंगुरी बाग येथील ४० वर्ष जुनी इमारत जमीनदोस्त; रस्त्यावर अतिक्रमण हटवले
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २५ जून :–
शहरातील धोकादायक इमारतींवर महापालिकेने मोठी कारवाई सुरु केली असून, मोतिकारंजा अंगुरी बाग परिसरातील सुमारे ४० ते ५० वर्ष जुनी दोन मजली धोकादायक इमारत आज जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई महापालिका अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाने आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार केली.
सदर इमारत सुमारे २८ बाय ५० फूट आकाराची असून, मालक राजेश गुगळे यांच्या मालकीची होती. ही इमारत गेल्या काही काळापासून रिकामी होती आणि तिचा काही भाग डीपी प्लाननुसार नियोजित रस्त्यावर येत होता. परिसरात शाळा, धार्मिक स्थळ आणि लहान मुलांची वर्दळ लक्षात घेता, ही इमारत रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत होती. त्यामुळे आयुक्त श्रीकांत यांनी आठवड्याभरापूर्वी स्वतः या भागाची पाहणी करून सहाय्यक आयुक्त रमेश मोरे यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
महानगरपालिका अधिनियमांतर्गत सर्व आवश्यक नोटिसा बजावून व मुदत दिल्यानंतरदेखील प्रतिसाद न मिळाल्याने, आज ही धोकादायक इमारत निष्काशीत करण्यात आली.
याच मोहिमेअंतर्गत, सिटी चौक – रंगार गल्ली फुलबाजार परिसरातील रस्त्यावर अतिक्रमण करणारी तीन अनधिकृत लहान दुकाने व काही बांधकामेही हटविण्यात आली. यामुळे गायत्री चार्ट भंडारपर्यंत रस्ता पूर्ण मोकळा झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
तसेच, मोतीकारंजा येथील महापालिकेच्या शाळेजवळील आठ लोखंडी टपऱ्या आणि इतर किरकोळ अतिक्रमण शेडसह हटवण्यात आले.
सदर कारवाई आयुक्त श्रीकांत यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त व अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, सहाय्यक आयुक्त सविता सोनवणे, रमेश मोरे, संजय सुरडकर, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, महेश खडसे, मजहर अली, रवींद्र देसाई, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव व नागरी मित्र कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली.
शहर स्वच्छ, सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिका सज्ज!