कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई; मुख्यमंत्री फडणवीस यांची मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा

बातमी: महाराष्ट्र वाणी.com
मुंबई, दि. ३ जून :– राज्यात अलीकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अशा शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पावसामुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध मंत्र्यांनी कापणी झालेल्या पिकांचे नुकसान, सुकी मासळी, रस्त्यांचे आणि पुलांचे नुकसान याविषयी मुद्दे मांडले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागांना आवश्यक त्या कार्यवाहीचे निर्देश दिले.
मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सांगितले की, २७ मे रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घरांची दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी निधी देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागांना एकूण ४९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
खरीप २०२५ आणि पुढील कालावधीसाठी नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी भरपाईचे दर आणि निकष २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार लागू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वनमंत्री गणेश नाईक व बंदरे विकास मंत्री निलेश राणे यांनी पावसामुळे झालेल्या सुकी मासळीच्या नुकसानीबाबत मच्छिमारांना मदतीची मागणी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मदत विभागाला प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी रस्ते आणि पुलांच्या नुकसानीबाबत सूचना केल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी रेड अलर्ट जाहीर झालेल्या भागातील दुरुस्तीला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.
जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी उजनी, जायकवाडी आणि गोसीखुर्द धरणांतील पाणीसाठ्याची माहिती दिली. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी सांगितले की, राज्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या गावांची संख्या दोनशेने कमी झाली असून टँकर संख्येतही घट झाली आहे.
राज्य शासन शेतकरी आणि नागरिकांच्या मदतीस तत्पर असून, नुकसानीच्या भरपाईसाठी तातडीने निर्णय घेतले जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.