आ. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड, फर्दापुर, सोयगावमध्ये ‘स्मार्ट सीसीटीव्ही’ प्रणाली कार्यान्वित
जिल्हा नियोजन निधीतून ‘सुरक्षित शहर’ उपक्रमांतर्गत हायटेक नियंत्रणकक्ष, पब्लिक अॅड्रेस सिस्टीम कार्यान्वित
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि ५ ऑगस्ट :- सिल्लोड, फर्दापुर आणि सोयगाव या शहरांमध्ये ‘सुरक्षित शहर’ उपक्रमांतर्गत अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली, नियंत्रणकक्ष आणि पब्लिक अॅड्रेस (पी.ई.) सिस्टीमचे लोकार्पण आज (५ ऑगस्ट) मा. अब्दुल सत्तार, माजी पालकमंत्री व सिल्लोड-सोयगावचे आमदार यांच्या हस्ते संपन्न झाले. जिल्हा नियोजन निधीतून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात आलेल्या या प्रकल्पाचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी झाली.
यावेळी मार्गदर्शन करताना अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, “या यंत्रणेच्या माध्यमातून शहरात २४ तास डिजिटल नजर ठेवली जाणार असून, गुन्हेगारीला आळा बसणार आहे. गणेशोत्सव, सभा, मोर्चे अशा गर्दीच्या प्रसंगी वाहतूक नियंत्रण आणि जनतेला सूचना देणे सुलभ होणार आहे.”
पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड म्हणाले, “नियंत्रण, सुरक्षा आणि विश्वास या त्रिसूत्रीवर ही प्रणाली आधारलेली असून, ती पोलिसांना स्मार्ट पद्धतीने काम करण्यास सहाय्यक ठरेल. ही यंत्रणा शहराच्या ओळखीचा भाग ठरेल.”
कॅमेरे आणि तांत्रिक वैशिष्ट्ये :
सिल्लोड: १३२ कॅमेरे, १४ पी.ई. सिस्टीम, २ नियंत्रणकक्ष
फर्दापुर: ४० कॅमेरे, ५ पी.ई. सिस्टीम (अजिंठा लेणी परिसरासह)
सोयगाव: ४३ कॅमेरे, ७ पी.ई. सिस्टीम
एकूण: २१७ कॅमेरे आणि २४ पी.ई. सिस्टीम
प्रणालीची ठळक वैशिष्ट्ये :
IP बेस्ड कॅमेरे – उच्च दर्जाचे रिझोल्यूशन
चेहरा ओळख प्रणाली (FRS)
वाहन क्रमांक ओळख प्रणाली (ANPR)
ध्वनी टिपणारे मायक्रोफोन
३६० अंश फिरणारे PTZ कॅमेरे – रात्रीसुद्धा स्पष्ट चित्र
पब्लिक अॅड्रेस सिस्टीम – सूचना, आपत्कालीन संदेश प्रसारित करण्यासाठी
डेटा साठवण क्षमता – वायर कापला तरी ७ दिवस डेटा स्टोअरेज, तर कंट्रोल रूममध्ये ९०-१०० दिवस पुरेसा साठा
या प्रणालीमुळे मुख्य रस्ते, बाजारपेठा, धार्मिक स्थळे, कार्यालये, वाहतूक केंद्रे आदी ठिकाणी २४x७ कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.
उपस्थित मान्यवर :
या उद्घाटनप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, पोलीस उपअधीक्षक डॉ. दिनेश कोल्हे, पो.नि. शेषराव उदार, स.पो.नि. रविंद्र ठाकरे, प्रफुल्ल साबळे, पंकज बारवाल यांच्यासह लोकप्रतिनिधी, उद्योजक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📸 शहर सुरक्षिततेच्या दिशेने – ही केवळ सुरुवात आहे!