‘भक्तसेवा हीच ईश्वरसेवा!’ – आषाढी वारीत वारकऱ्यांना मोफत खिचडी व फळांचे वाटप; वृद्धाश्रमाचा स्तुत्य उपक्रम
आनंदनगर, शिवाजीनगर, भारत नगर परिसरातून जाणाऱ्या वारकऱ्यांना मोफत साबुदाणा खिचडी व फळांचे वाटप
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ६ जुलै:- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे पायी निघालेल्या हजारो वारकऱ्यांची सेवा करत मातोश्री वृद्धाश्रम आणि माई वृद्धाश्रम यांनी एक विशेष सेवा उपक्रम हाती घेतला. आनंदनगर, शिवाजीनगर, भारत नगर परिसरातून जाणाऱ्या वारकऱ्यांना मोफत साबुदाणा खिचडी व फळांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात इनरव्हील क्लब औरंगाबाद लोटसच्या अध्यक्षा रश्मी चेचानी, गुरलीन कौर कोहली, रुबी कोहली, केदार चेचानी, एनजीओ अध्यक्ष रामदास वाघमारे आणि माई वृद्धाश्रमाच्या संचालिका मीरा वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी एक क्विंटल साबुदाणा खिचडी आणि विविध फळांचे वाटप करण्यात आले. केवळ अन्नपुरवठाच नव्हे, तर या सेवेने थकलेल्या जीवांना ऊर्जा देण्याचे कार्य केल्याचे सांगण्यात आले.
मीरा वाघमारे म्हणाल्या, “विठोबावर जितकं प्रेम करतो, तितकंच त्याच्या भक्तांवर करावं, हीच खरी भक्ती.”
या उपक्रमात इनरव्हील क्लब औरंगाबाद लोटस तसेच अनेक दात्यांचा सहभाग लाभला. स्थानिक नागरिकांनीही सेवाकार्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
'भक्तसेवा हीच ईश्वरसेवा' हे तत्त्व साकार करणाऱ्या या कार्यक्रमात सागर पागोरे, अंशीराम वाघमारे, प्रेरणा आझादे, शोभा त्रिभुवन, सुमन साळवे, संदीप आझादे, ऋत्विक, दीपक, गौरव वाघमारे आदींनी मोलाची भूमिका बजावली.
वारीतील सेवा म्हणजेच विठ्ठलस्मरणाची खरी अनुभूती!